Wednesday, 28 March 2018

ग्रेस

रेडिओ जवळ बसून "शुक्रतारा "लागण्याची  वाट पाहत होतो.तरुण रक्त,भाव गीतांचा वेड अन त्यात पाडगावकर..रेडिओ आईमुळे ऐकण्याची सवय होती.एक गाणं लागलं.दोन  ओळी ऐकल्या की कळलं पंडित मंगेशकरांचा आवाज आहे.जस जस गाणं पुढे सरकत होत तस तस मी स्वतःला विसरत चाललो होतो.
रेडिओ म्हणजे हरवलेली प्रेयसी भेटली आहे ह्या अविर्भावात त्याच्या कडे पाहत होतो.
ते गाणं होत ,"ती गेली ,तेव्हा रिमझिम ".तेव्हापासून मी जो काही ग्रेसच्या अगम्यतेत वहावत गेलो आहे ते आजतागायत डुबून जिवंत आहे.
ह्या अवलियाचा २६ मार्च ह्या दिनी स्मृतिदिन."माणिक सीताराम गोडघाटे".
इन्ग्रिड बर्गमन चा चित्रपट पाहून तिच्या ग्रेसवर मोहून ह्यांनी आम्हाला आमच्या जाणिवांना,नेणिवांना आकार देणाराग्रेसदिला.
ह्यांच्या कविता कळाव्यात म्हणून वाचणाऱ्याला ग्रेस कधीच कळणार नाहीत.
एकाच कवितेमध्ये निसर्गाला,जाणिवांना वळणे घालून हा माणूस तुम्हाला सजीवांच्या प्रेमात पाडेल,विरहात भिजवेल किंवा मग अस्वस्थतेच्या रानात नेऊन सोडेल.करा आता विहार तुम्ही.
आणि आपण वाचक म्हणून अर्थ शोधावा;फक्त तो  वैश्विक किंवा प्रस्थापित कवींसारखा कळता असावा हि अपेक्षा नको.
सायंकाळी फक्त सूर्यच जाणं, वारेसाच हळुवारपणे वहाण ,समईच मंद तेवत असण अनुभवायचं असत बस्स.
संध्याकाळच्या कवितामी कितीदा वाचला आहे ,सोबतच असतो.तसच काहीसमितवा आहे.
स्मृतिगंधही कविता सतत माझ्या मनात रुंजी घालत असते.
           "तू उदास मी उदास मेघही उदासले"
           "स्मृतीतले विदग्ध नाद पैंजणात सांडावे"
ह्या दोन ओळीवरच माझी स्वारी कित्येक दिवस रेंगाळत होती.ती अजूनही तिथेच अडकून समोर जाते.
आज ग्रेस सोबत नाहीत आपल्या आणि ह्या दोन ओळी स्वतःसाठीच लिहून ठेवल्या असच वाटत.(आपल्याकडून त्यांच्यासाठी).
ग्रेसची राजकीय ,सामाजिक भूमिका फार मोठी,दखलपात्र नसेल किंवा फार नाहीच पण काही बाबी आहेत ज्या त्यांचे समाजाभिमुख संवेदनशील मन सांगून जातात.
ते म्हणतात कलाकार हा समाजशील असतो पण समाजधार्जिणा नसतो.
काय सुचवायचं असेल ?
सडेतोडपणे म्हणतात “An Artist is not Special Kind of Man and Every man is Special kind of Artist “हे साफ खोटं आहे.उगाच बर वाटाव म्हणून का?आणि कुणाला?सर्वसामान्यांना?
त्यांना हे अति आत्मसंतुष्टीचं द्योतक वाटत असणार.त्यांच आपल सरळ असत,”An Artist is differently thousand times special kind of Man”.कलाकाराच समाजावर प्रेम असत.कलाकार हा समाजशील असतो पण समाजधार्जिणा नसतो.
काय सुचवायचं असेल ?
जी..कुलकर्णींच्या आठवणीतल्या कार्यक्रमात म्हणाले कि माझ्या दंतकथा आहेत आणि त्यामुळे मला लोक घाबरतात.माझ्याकडे शस्त्र नाही,राजकीय पालखीचं ओझं नाही ,मी गुंडा नाही तरी हे घाबरणं म्हणजे ,”It is the best possible type of lerical attitude I am getting from my wonderful Readers.”
आहे का दुःख,तक्रार नाही ना.रडगाऱ्हाण नाही.
मी कलाकार असून माझी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नाही कि वेड्याच्या इस्पितळात नोंद नाही ह्यापेक्षा अजून काय सामाजिक कार्य अपेक्षित आहे.”
राहून  राहून वाटत हाच तर तो समाजशील आणि समाजधार्जिणा फरक तर नाही ना.
ग्रेसांनी सांगितलेला पुरुषार्थाचा अर्थ किती गर्भित समाजाभिमुख आहे ते जाणवत आणि कलाकार निश्चितपणे समाजाला बांधलेला असतो ह्याची जाणीव झाली."आजच्या आधुनिक काळातली बाईपर्यंतच्या सर्व विकासाची परिवर्तने सृजनशीलतेच्या दिशेतून तपासून पाहणे हीच माझ्या पुरुष असण्याच्या पुरुषार्थाची व्याख्या होय"
ज्यांना कुणाला पुरुषार्थाचा गर्व/माज आहे त्यांनी ही ओळ मनावर कोरावी.
मला आजही त्यांची कविता त्रासदायक एकांतातून ,अपेक्षांच्या जाळ्यातून आणि ऊतू जाणाऱ्या प्रेमाच्या डोहातून अलगद उचलून बाहेर आणते.
कुणाला फार बोलायची सांगायची गरज लागत नाही.
      "ज्याचे त्याने घ्यावे,ओंजळीत पाणी,"
       “कुणासाठी कुणी थांबू नये"
ग्रेसला यायला सायंकाळ लागत नाही.ते मनात आले कि सायंकाळ होते.
जमेल तस बोलतो आम्ही.सगळंच कळत असं नाही पण दुर्बोध नक्कीच नसत.
राहून राहून वाटत ग्रेसच साहित्य जागतिक स्तरावर पोहोचावं.जग ग्रेस-वेडाने पछाडून जावं.
त्यांच लिखाण वाचून एक कलाकार म्हणून त्यांची किती झीज झाली असेल नाही पण हे हि ते आधीच म्हणून गेले "की कवीचे जगणे आणि त्याचे तथाकथित लिखणे  ह्यातून त्याच्या शरीराची आणि तितकीच  त्याच्या आत्म्याची झीज होत असते.काही वेळा स्फोट वा आघात इतके जबरदस्त असतात कि त्याचे तुकडेही पडतात आणि ते तुकडे अथवा झीज पुन्हा जोडता येत नाहीत"
असेच असंख्य तुकडे आणि झीज घेऊन ग्रेस आपल्यातून निघून गेला .
ग्रेस,मला तुम्हाला भेटून मला कळलेला तुमच्या कवितेचा अर्थ सांगायचा होता.माझी एखादी कविता ऐकवायची होती.
तुम्ही साधत असलेला एकांताशी संवाद ऐकायचा होता.
तुम्ही कुठे आहात नाही माहिती रोज ती सांयकाळी झुळूक "ग्रेस"च्या कवितेची स्पंदने अंतरंगात फुलवते.
मी इतका नक्कीच मोठा नाही कि तुमचे आभार मानावे पण तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे ऋण माझ्यावर नक्कीच आहे आणि त्यासाठी मी देवाचा नक्कीच शतजन्मी आभारी असेन.
त्याच संध्याकाळच्या करंगळीला धरून,मावळतीच्या सूर्याला पाहून,मंद प्रकाश आणि त्यात तेवणारी त्या वातीला पाहून तुमच्या स्मृतिदिनी मी काही शब्द सुमने तुमच्या चरणी अर्पण करत आहे ती मानून घ्यावी.(त्यांना सुगंध नसेल त्यांना रूप नसेल पण ती नक्कीच फुलली तुमच्यासाठीच आहेत)
     “एक तो दिवस असतो आणि एक ती रात्र
     आणि मग त्यांना सांधणारी असते तुझी          
     सांयकाळ..
     असो उठलेले काहूर विचारांचे वा
     उठली असो भावनांची मनात राळ..
     असो कुठले स्थान असो कुठले गाव.
     असो सोबत कुणी माझ्या
     रंक अथवा राव..
     ती असेल लाडकी तुझी
     सतत माझ्यासोबत.
    "ग्रेस" सांगू काय तुला
    काव्याने तुझ्या केले
    काय आमच्यासोबत.
    शब्दांची बाग तुझी
    वा गाण्यांची चाल
    तोच काय आमचा वारसा
    उद्या ,आज आणि काल..”

               -ग्रेसाक्त

Wednesday, 20 December 2017

फोटो

हा तुझा फोटो काढताना मी तिथे असतो तर त्या कॅमेर्यातून तुला न्याहाळत बसलो असतो..मला इतकं काही सुचल नसत कि इतक्या नीरागस चेहऱ्याकडे पाहण सोडून त्याचा फोटो काढत बसाव..तुला असं कुठेतरी विचारात हरवलेली पाहून मला मीच तुझ्यात हळूहळू हरवून बसलो असतो जणू पाण्यात साखर विरघळली अगदी तसं..
तुझ्या इवलूश्या डोळ्यामध्ये मी माझ्यासाठी खूप जागा शोधली असती कारण माझ्याशिवाय तेथे कुणी असावं असं मला
कधीच वाटलं नसत अगदी तुझ्या स्वप्नांना थोडं सरकवलं असत ..नाही असूदे त्यांना तिथे.त्यांच्यामुळेच तर तू आनंदी असणार ना..
त्या इवलुश्या दोन डोळ्यांमध्ये असणार ते नकट नाक..मला सतत त्या श्वासांचा हेवा वाटला असता कारण त्यांना तुझ्या हृदयात जायला मिळत आणि मी तो रस्ता शोधतच आहे अजूनही..
तुझ्या त्या मऊ गालांच्या लादीवर स्थिरावलेला हात मला अजिबात आवडला नसता..तो  कसा इतका जवळ येतो त्यांच्या हा.😡. मी त्याला तिथून हटवलं असत पण मग विचार केला कि असूदेत त्याला तिथे...तू तुझ्या निरागस चेहर्याचा भर त्याच्यावर लादून  तुझ्या विचारांना मुक्त केलं असत आणि मला तुला तसं पहायला खूप आवडत..
तू तुझे केस बांधून त्यांची वेणी  अशी मानेमागून समोर घरंघळत ठेवलीस ते पाहून तर मी इतका मोहित झालो असतो कि मी त्या केसांच्या गुंत्यात तुझ्या-माझ्या  प्रेमाचा गुंता  हळुवार सोडवला असता..आणि तू त्या वेणीसोबत जशी खेळतेस तसं माझा हात हातात घेऊन माझ्या बोटांशी  खेळावं असं वाटलं असत..
तू स्वतःभोवती जो  स्कार्फ गुंडाळला आहेस ते पाहून मला रडूच  आलं असत आणि  वाटलं असत अशीच तू माझ्या बाहुपाशात  आणि प्रेमाच्या स्पर्शाने मोहरून गेली असतीस तर..
पण हे  सगळं  मी तिथे असतो तरच  आहे का ??
माहित नाही 🧐🧐
पण माहित नाही तू 
आहेस का सुंदर??
गुलाबासारखी कोमल
चाफ्यासारखी बहरलेली
अन गुलमोहरासारखी मोहरलेली
माहित नाही  तू 
कशी  आहेस  ते ???
पण माहिती 
कुणासाठी तरी तू
सदैव फुलत राहणारी 

कळी आहेस..☺️

Sunday, 10 December 2017

का बरं????

का बरं ? का असच होत ?
कातरवेळी च मी उदास होतो
भकास सगळं वैरण्य वाटत
तू असलीस कि ती मात्र
सांजवेळ मोगर्यासारखी बहरते..
का बरं ? का असच होत?
माझ्या पावसात भिजुन
आठवणींचा उमाळा त्याचा दाटे..
का बरं ? का असच होत?
तुला पाहून हरवाव म्हणतो
अन तुलाच हरवून बसतो..
का बरं ? का असच होत?
तु बाजूला असलीस कविता सुचते
तुला ते निसते सगळे क्रमीक वाटते..
का बरं ? का असच होत?
तु नाही बोलणार अन
मी विचारणार तेच
का बरं ? का असच होत?
              -ग्रेसाक्त(माझं नाव)

Monday, 1 May 2017

एक मे मराठीचा

१ मे ची सकाळ झाली.गजर वाजला त्यातही गाणं लागलं "गर्जा महाराष्ट्र्र माझा "..
काही जण उठून तयार होऊन  पांढरेशुभ्र कपडे घालून ध्वजवंदनाला गेले.
विद्यार्थी निकालाच्या अपेक्षेने हाती उपेक्षा मिळते का ह्या घालमेलीत शाळेत हजर  झाली.
काही अजूनही अंथरुणात रेंगाळत  आहेत.
त्यांना आठवत नाही बहुतेक आज काय आहे ते?
पण आहे काय आज?
मलाही  आठवत नाही..काय तो संयुक्त महाराष्ट्र झाला होता ना.कितीतरी वर्ष पूर्ण झाली.
ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत ,शिवबांपासून सावरकर ,टिळकांपर्यंत आणि खांडेकर,तेंडुलकरांपासून ते पाडगावकरपर्यंत आणि नेमाडेपर्यंत ह्या सगळ्यांनी जे काही योगदान दिलय आणि त्यासाठी  आपण कृतज्ञ व्हांव ही आपल्यात भावना जिवंत आहे का?
असं वाटत नाही का कि आपण सगळे (मी पण ) अशा प्रवाहात  आपली  नाव  हाकत आहोत जो प्रवाह आटणार आहे आणि  मग परिस्थिती अशी येईल कि नाव अडकेल आणि आपण चालणं  विसरलेले असू .
आपल्या  भाषेवर,आपल्या अस्मितेवर आपल्या संस्कृतीवर जीवापाड  प्रेम  करणे म्हणजे दुसऱ्यांच्या भाषेचा,अस्मितेचा तिरस्कार करणे नव्हे हे आपण साफ विसरलोय
भाषा टिकली तर सगळं काही  टिकत कारण ती एकच गोष्ट जी फार मोठा  दुआ आहे.
ज्ञानाच्या घड्यामधली आणि अज्ञानाच्या रित्या ओंझळीसाठी ती धार आहे ..
कल्पनाविलास आणि स्वप्न ह्यामधला समतोल राखायला शिकवणार अस्त्र आहे .
माझ्यामधल्या ' मी ' ला टिकवून ठेवणार शास्त्र आहे.
आणि गरजेप्रमाणे चवीसाठी लागणाऱ्या मिठासारखी अभिमान टिकवणारी आहे.
आपली अडचण ही आहे ना कि आपण आपली मूळे फार लवकर सोडतो.
असा महाराष्ट्रात माणूस नाही ज्याला हिंदी येत नाही.तरी काही लोक सरळ तोंडावर बोलतात "मराठी लोगों के दिल अच्छे नही होते?"
कुठे गेलाय तो स्वाभिमान??
दाक्षिणात्य लोक त्यांची भाषा सोडून कुठलीच भाषा बोलत नाहीत.हिंदीही नाही राष्ट्रभाषा असूनही.
(मी त्यांचा समर्थन करत नाहीये .ज्यांना मराठी येत नाही नवखे आहात त्यांच्याशी हव्या त्या भाषेत संवाद साधायलाच हवा)त्यांना तिथे जाऊन कुणी  काही बोलत नाही.
एवढ्यावर त्यांना उत्तर काय  देतो आपण "नही सभी लोग बुरे नही है "..
म्हणून मी त्यांना मारत  बसायचं किंवा हुस्कावायचं असं माझं म्हणणं नाही.
दोन मराठी लोक उगाच विनाकारण मराठी सोडून सगळ्या जगाच्या भाषेत गप्पा मारताना  मी पाहिलंय ,म्हणलं तर सवय झाली असं त्यांचं म्हणणं असत.
किती मोठी शोकांतिका आहे ही...
हतबल झालोय आपण.गुडघे इतके झुकलेत कशाच्या भाराने माहित नाही पण आता ताठ उभं राहता येईल का ह्यावर आपणच आपल्यावर आश्वस्त नाही आहोत.
पण आपल्या भाषेचा आदर करायला लोकांना आपणच शिकवायला हवं ना..
आम्ही शाळेत गेलेलो त्या शाळेत काही लोक येतात मुलांना इंग्लिश शिकवायला.का तर म्हणे स्पर्धेत टिकावीत.मी सहज मुलांना विचारलं १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी (हे महिने ही नाही आवडत खरं तर असो )ह्या दिवशी काय आहे?ती मुलं ४ थी मधली होती म्हणून म्हणलं महाराजांचा इतिहास असेल सांगा बरं शिवाजी महाराजांचा जन्म कधी ,कुठे झाला?
फार तर दोघा-तिघांनी उत्तर दिली..
ह्या इंग्लिश शिकवायला जाणाऱ्या मंडळींना कळत नाही का कि विकास ,जडणघडण ही भाषा शिकवून नाही तर जी भाषा उमगते,ज्या भाषेत स्वप्न पडतात त्या भाषेत शिकवल्याने,ज्ञान दिल्याने होते.
मराठी शाळेच्या अवस्थेला ना सरकार जबाबदार आहे ना शिक्षक मग ते कसे ही असो.
जबाबदार ती पालक आहेत ज्यांना  स्पर्धा नावाच्या विस्मयकारक वाटणाऱ्या पण आभासी अशा मैदानावर गाढवं पळावयाची आहेत.
चिन्मयी राघवनला एका कार्यक्रमात विचारलं गेलं कि तुझे मुलं मराठी शाळेत शिकतात ?
खरं तर हा प्रश्न किती अयोय आहे.तिने सांगितलं "मुलांना भावविश्वाशी जोडणारी कविता मला माझ्या भाषेत मिळेल.बाहेर पडलं तर त्यांना गवतफुल काय असत दिसेल.इतका छान वारसा जो लाभलाय तो त्यांना देणं आणि त्याचा मनमुराद आनंद घेऊ देऊन ते अनुभवू देणं आपलं कर्तव्य आहे."
किती समर्पक उत्तर आहे.
माझी मुले  मराठी शाळेत जातात हे एखाद्या पालकाला सांगायला  लागण तेही महाराष्ट्रात राहून,मराठी असून हे किती लाज वाटण्यासारखं आहे.
बरं स्पर्धा  नामक गोष्ट काय हे माहिती नसताना काही दिड शहाणे बाजूच्याने कोणत्या शाळेत टाकलं मग मी ह्या शाळेत टाकेल ह्या अविर्भावात असतात.
आणि काही ' शाळांची अवस्था ' कारण देऊन सुटतात आणि काही लोक त्याच मराठी शाळेचे शिक्षक असतात..
नाही ना अवस्था शाळेची चांगली मग थोडं व्हा ना जबाबदार..मोर्चा काढा थोडा संवाद साधा.दुसऱ्या भाषेच्या शाळेत टाकलं  तेव्हा करताच ना आणि घरी अभ्यासही घेताच ना..पण मराठी साठी असं करणार नाही आणि दुसरया माध्यमात टाकणार कारण  शेवटी काही जणांचं स्टेटस (प्रतिष्ठा) मधे येत.
शेवटी सगळ्यात महत्वाचं विसरतो ते सर्वांगीण विकास..
मातृभाषेत शिक्षण झालेल्या मुलांची जडणघडण उत्तम होते हे स्पष्ट झालंय.
सगळं आपणच ठरवून मोकळे होतो .त्याला निसर्गाचे ना राग ना अंग दिसतात ,ना भाव दिसतात ना रूप.
त्याचे किती मार्ग तुम्ही नकळत बंद करता.त्याच्या आवडी त्याला कळण्याआधीच मारल्या जातात.
त्याला त्याच भावविश्व योग्य वयात नही मिळालं तर त्याच्या  स्वप्नांचे ,आकांक्षाचे झोके उंच कसे उडतील?
पंखांना बळ कस  मिळणार ?
अंगाईगीत असो व बडबड गीत ,भक्तीगीत असो व भावगीत ह्या सगळ्यातून होणारे नकळत अविरतपणे होणार संस्कार कसे होतील?
ह्या सगळ्यांची उत्तरे शोधण्यापेक्षा तुम्हाला माझी बडबड वाटेल वाटू देत तरी विचार कराच.
पण झुकली मान,वाकला कणा आणि गळालेला स्वाभिमान घेऊन जगायचं तरी किती दिवस हे विचारूया स्वतःला..
आपण करतो का आपल्या नाटकांवर,चित्रपटांवर प्रेम?
आपण सतत कुणाकडे काही तरी आहे जे आपल्याकडे नाही  ह्यावर टिवल्या-बावल्या करत असतो पण आपण आपल्याकडे जे आहे ते कुणाकडेच नाही ह्याचा विचार नाही करत किंवा आपणांस जाणीवही नाही कारण बालपण जर दुसरया अंगणात गेलं तर स्वतःच्या अंगणातला पारिजातही सुगंधी वाटत नाही.
अडचण तिथे निर्माण होत नाही जिथे आपण मराठी न येणाऱ्या माणसाला हिंदी बोलतो तिथे होते जेव्हा २० वर्षांपासून इथे राहणाऱ्या माणसाशी आपण त्याच्या भाषेत गप्पा मारत बसतो हे किती संयुक्तीक आहे?

छोटा भीम दाखवताना इसापनीतीच्या कथाही ऐकवाव्यात.भीती ही निर्माण होतीये कि बोनापार्ट वाचता वाचता माझा शिवबा काळाच्या ओघात वाहून जाऊ नये..
मी हे सगळं काही पालकांना उद्देशून नाही म्हणत आहे.मला आणि सगळ्या मराठी जणांना म्हणतोय.
कारण शेवटी येणाऱ्या पिढीने काय संगठीत केले आहे  जेणेकरून त्यांचा संचय अभिमानास्पद  वाटावा  हे आपण ठरवायचं आहे ..
इतिहासातले स्थान असो व भविष्यातले अस्तित्व .हे मोठया बंगल्या आणि सोन्याच्या बंगईने नाही टिकत..ते टिकत तुम्ही केलेल्या सांस्कृतिक विकासावरून.वारसाने मिळालेल्या  ठेव्याला  अवीट गोड ठेवा म्हणून प्राशान  केल्याने.

भाषा कोणतीच वाईट नाही पण माझं तेज आधी माझ्या मातृभूमीचा अंधार दूर करून मग दुसऱ्याची मायभूमी उजळीत करेल इतकी कृतज्ञता शिकवावी पिढीला एवढीच माफक अपेक्षा..
आपली माय मराठी काहीतरी सांगत आहे ऐकू या..


 " कुणीतरी बोला रे माझ्याशी ||

मला कळते त्या भाषेत बोला रे
मला माझ्या  गतवैभवाची दिवस आठवू द्या रे
मला माझ्या ह्या भूमीवर जगू द्या रे
कुणीतरी बोला रे माझ्याशी ||

मी ओळखते ह्या कड्यांना
मी ओळखते ह्या नद्यांना
मी जपते  ह्या इतिहासाला
मी ओळखते रे ह्या महारष्ट्र देशाला
 कुणीतरी बोला रे माझ्याशी ||

मला श्वास घेऊ द्या रे
मला ही कुणीतरी ओळखा रे
 कुणीतरी बोला रे माझ्याशी

कुणीतरी बोला रे माझ्याशी ||"






एक सकाळ

गाढ झोपेतून जागा होऊन ताडकन उठून बसलो की लगेच चक्कर आली. माहीती होते जाग आली की लगेच असे ताडकन न उठता एका अडंगावर येऊन उठायचे असते. विचारच इ...